वाईची हिरवाई

पुण्याहून महाबळेश्‍वर,पाचगणीला जाण्याऐवजी वाईला गेल्यावर कृष्णाकाठी घाटावर पुरातन मंदिरे आहेत. त्यात एक ढोल्या गणपती मंदिर (दहा फुटी गणपती मूर्ती आहे. मंदिर सुंदर आहे) आहे. जवळच श्री शंकराचे कोरीव कामाचे सुंदर मंदिर आहे. मंदिर, नदी, शिवलिंग फारच सुंदर आहे. ते पाहून वाईतून धोम गाव व धरणाकडे एक रस्ता जातो. रस्त्याच्या कडेने दाट झाडी आहे व हिरवीगार शेते. बाराही महिने हा परिसर हिरवागार असतो. मन प्रसन्न होते. शुद्ध हवा, मनाला भुरळ घालणारा आसमंत. पुढे या रस्त्याने पाच-सहा मैलांवर कृष्णाकाठचे मेणवली गाव लागते. गाव पेशवेकालीन आहे. येथे जुने वाडे आहेत. नाना फडणवीस यांचा वाडा आहे. वाड्याची रचना वेगळी व कल्पक आहे. नैसर्गिक रंगाची भिंतीचित्रे आहेत. नानांचा शिसमचा मोठा पलंग आहे. वाडा बराच पडझड झालेला आहे. आता तेथे नोकरचाकर राहतात. वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे. तेथेच कृष्णाकाठी चंद्रकोराकृती सुंदर घाट आहे. पुरातन मंदिरे आहेत. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस दाट झाडी, त्यामुळे परिसर फारच निवांत, रमणीय आहे. पुढे त्याच रस्त्याने सात मैलांवर धोम गाव आहे. डाव्या बाजूस धोम धरण, गाव, कृष्णा नदी, सुंदर घाट, नृसिंह मंदिर व अप्रतिम शिल्पकलेचे काळ्या पाषाणातील शिवालय व यापुढील अनोखे नंदी मंदिर व छोटी किल्लेवजा गढी आणि सर्वत्र निसर्गरम्य परिसर. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनाला भुरळ घालणारी नीरव शांतता. आपल्याला गडबड-गोंगाटाची सवय, पण येथे वेगळाच अनुभव... जसे काय ऋषिमुनींचे तपस्यास्थान असावे. वाईस गेल्यावर मंदिरापासून जवळ, गावात बंडा जोशी यांची खाणावळ आहे. घरगुती सुग्रास जेवण मिळते. जेवणात वरण-भात, गरम घडीची पोळी, उसळ, आमटी, चटणी, कोशिंबीर, ताक असा जेवणाचा बेत असतो. जेवणाचे दरही स्वस्त आहेत. मन तृप्त होते. तेथून पुढे उजव्या बाजूच्या रस्त्याने बलकवडी धरण व धोम धरणाचा परिसर लागतो. धरणाच्या पाण्यात नौकानयन करून पुढे बलकवडी धरणासाठी जाता येते. धरणाचे काम अर्धवट आहे, पण परिसर निसर्गरम्य आहे. एक-दोन पुरातन मंदिरे आहेत. ते पाहून आपण त्याच रस्त्याने परत वाईस येऊन पुण्यास आठ वाजेपर्यंत सहज पोचू शकतो. सर्व प्रवास 130 किलोमीटरचा होतो. जर दोन दिवस अवधी असेल तर वाईस बऱ्यापैकी लॉज आहेत. आनंदवनसारखे मेणवली रस्त्यावर राहण्याचे, निसर्गाच्या सान्निध्यात, तेही स्वस्तात सोय असलेले ठिकाण आहे. दुसऱ्या दिवशी पाचगणीस जाऊन पाचगणी स्थळदर्शन करून आपण संध्याकाळी पुण्यास आरामात येऊ शकतो.
- सुभद्रा गोसावी

No comments: