पावसाळा सुरू झाला की आषाढ संपून श्रावण कधी येतो ते कळतसुद्धा नाही. श्रावणात सह्याद्री पावसात न्हाऊन तृप्त झालेला असतो. त्याच्या अंगाखांद्यावरून पाण्याचे ओहोळ खळाळत असतात. रानहळदीची फुलं फुललेली असतात. अशाच एखाद्या श्रावणातल्या रविवारी पायथ्याच्या खांडस गावातून भीमाशंकरचा डोंगर चढायचा. संध्याकाळी भीमाशंकरला पोहोचले की वरती मुक्काम करायचा. दुसऱ्या दिवशी असतो श्रावणी सोमवार. भीमाशंकराचं पहाटे दर्शन करायचं. गुप्त भीमाच्या धबधब्याखाली भिजायचं. पुढच्या वर्षी पुन्हा येईन सांगून देवाचा निरोप घ्यायचा. कित्येक वर्षं श्रावणातला पहिला सोमवार मी चुकवला नव्हता. त्याच्या आठवणी अजूनही मन ताजंतवानं करतात. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकापासून रिक्षाने खांडस गाव गाठायचं. खांडस गावाला सह्याद्रीची मुख्य रांग लागूनच आहे. खांडस गावातून भीमाशंकराची चढाई दोन टप्प्यांत करायची. त्यातला पहिला टप्पा चढण्यासाठी गणपती घाट व शिडी घाट असे दोन मार्ग आहेत. गणपती घाटात घाटाचं रक्षण करणाऱ्या देवतेचं, गणपतीचं मंदिर आहे. गणपती घाट तुलनेने चढायला सोपा आणि निसर्गरम्य आहे. गणपती घाटाने चढताना पदरगडाचं अतिशय सुंदर दर्शन होतं. घाट चढताना लागणारे ओहोळ व धबधबे प्रवासाचा शीण अजिबात येऊ देत नाहीत. गणपती घाटाने पहिला टप्पा चढायला चार तास लागतात. पहिला टप्पा चढायची अधिक जोखमीची वाट म्हणजे शिडीची वाट. ही वाट अधिक उभ्या चढणीची असून वाटेत तीन ठिकाणी शिड्या लावल्या आहेत. त्याशिवाय एका ठिकाणी वाट इतकी अरुंद आहे की दरीकडे पाठ करून कातळात केलेल्या खोबणीत दोन्ही हाताची बोटं रुतवून ती पार करावी लागते. शिडीने पहिला टप्पा चढायला तीन तास पुरेत. पहिला टप्पा संपून चढायचा दुसरा टप्पा सुरू होताना पठार लागतं. त्या पठारावर खांडस गावातून चढून येणाऱ्या शिडीची वाट व गणपती घाट या दोन्ही वाटा एकत्र येतात. येथून पुढे झिगझॅग चढणारी वाट दमछाक करायला लावते. दोनेक तासांच्या चढाईनंतर शेवटच्या टप्प्यात वाट दरीला समांतर होते, चढ कमी होतो. पावसाळ्यात आलात तर दरी धुक्याने भरलेली असते. पायाखालची वाटही दूरवर दिसत नाही. आपण स्वर्गात आहोत आणि थेट ढगात चालतो आहोत, असा भास होतो. अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपण भीमाशंकराच्या पठारावर प्रवेश करतो. इथे धुकं असतंच, पण सोबतीला गार बोचरा वारासुद्धा असतो. पाचेक मिनिटं चालल्यावर धुक्यातूनच अंधुक गाड्यांचे हेडलाईट दिसायला लागतात आणि आपण भानावर येतो. अरे, या जादुई दुनियेत या गाड्या कुठून आल्या? गाडीतळापासून मंदिरापर्यंत उतरत्या पायऱ्यांची वाट आहे. तिथल्याच एखाद्या घरात आपली पथारी पसरायची. भीमाशंकरची उंची आहे 3250 फूट. श्रावणात पठारावर पाऊस सतत भुरभुरत असतो. भीमाशंकराच्या मंदिराचा कळस धुक्यात हरवून गेलेला असतो. भीमाशंकर मंदिराची बांधणी नागर किंवा उत्तर भारतीय पद्धतीची आहे. मंदिराशेजारीच मोक्षकुंड आहे. शंकराचं दर्शन झालं की जंगलात जाणाऱ्या वाटेने गुप्त भीमाशंकराकडे निघायचं. भीमा नदीच्या पात्रात तीन टप्प्यांत असणारा धबधबा आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची उंची आहे सात फूट. तिथे कातळावर छोटी शिवलिंगं कोरली आहेत. मोठ्या कुंडात उगम पावलेली भीमा गुप्त भीमाशंकरला पुन्हा प्रगट होते असं म्हणतात. गुप्त भीमाशंकर पाहून परत येताना धबधब्याच्या आधी नदी ओलांडायची आणि वेगळ्या वाटेने मंदिराकडे परतायचं. या वाटेवरसुद्धा एक फोटोजिनिक धबधबा आहे. नाना फडणविसांनी मंदिराचा जीर्णोधार केला होता. वसई विजयाचं चिन्ह असणारी एक मोठी घंटा या मंदिर परिसरात आहे. भगवान शंकरांनी इथे त्रिपुरासुराचा वध केला होता. त्रिपुरारी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव असतो. भीमाशंकर ते गुप्त भीमा दरम्यानच्या जंगलात तुम्हाला शेकरू दिसू शकतो. ही असते उडणारी खार. तपकिरी रंगाचा हा प्राणी त्याच्या पांढऱ्या झुबकेदार शेपटीसह सुंदर दिसतो. पावसाळा संपताना शेकरू त्याच्या झाडावरच्या घरट्याजवळ दिसू शकतो. गुप्त भीमाशंकराहून पुढे गेल्यावर अर्ध्या तासात रस्ता एका तिठ्यावर येतो. नदीच्या बाजूने जाणारा रस्ता जातो भोरगिरी किल्ल्यावर आणि नदी ओलांडून जाणारा रस्ता जातो वांद्रेवाडीला. वांद्रेवाडी-भीमाशंकर हा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे. मुंबईहून कर्जतला जाताना भिवपुरी रोडहून वांद्रेवाडीची खिंड आपल्याला दिसते. भिवपुरी-वांद्रेवाडी-भीमाशंकर रस्ता कित्येक वर्षं फायलीमध्ये पडून आहे. भीमाशंकराच्या उत्तरेला असणाऱ्या अहुपे घाटातूनसुद्धा भीमाशंकर ट्रेक करता येतो. त्याशिवाय लोणावळा, तुंगार्ली, वळवण, मांजरसुंभा, कोंडेश्वर, कुसूर, सावळ, वांद्रेवाडी असा ट्रेकही करता येतो. भीमाशंकरला रस्त्याने यायचं, वर चाकण अथवा जुन्नर करत खेड मंचरला यायचं. इथून दोन तासांच्या घाट रस्त्यानंतर भीमाशंकरला पोहोचता येतं. राहण्या-जेवण्याच्या घरगुती स्वरूपाच्या सोयी इथे आहेत. हॉटेलं मात्र नाहीत. ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून भाविक इथे येत असतात. पण स्वच्छता, पाणी इत्यादी मूलभूत सुविधा इथे आढळत नाहीत. त्या लवकरच होतील अशी आशा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तुम्ही इथे याल तेव्हा किमान अपेक्षा ठेवून या. आंबेगाव व खेड तालुक्याच्या वादात या देवस्थानाचा विकास होईल तेव्हा होईल, ट्रेकर्सचं मात्र इथे स्वागत आहे. ओम शिव ओम शिव परात्वराशिव, ओंकाराशिव तव शरणम्! हे शिवशंकर भवानीशंकर, उमामहेश्वर तव शरणम्।
- मधुकरी धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट
युनिटyhai_malad@rediffmail.com">mailto:युनिटyhai_malad@rediffmail.com
साभार ः सकाळ