सहा दिवसांत सह्याद्री सर!

सहा दिवसांत सह्याद्री सर!

सह्याद्री म्हटलं की आपल्याला आठवतात घाट आणि खंडाळा-लोणावळा म्हटलं की आठवतात पावसाळी सहली। पण यापलीकडे सह्याद्री आणि खंडाळा-लोणावळा आहेतच की! मुळात खंडाळा-लोणावळा आहेत ते सह्याद्रीच्या कुशीतच... तिथलेच हे सहा दिवस...

पहिला दिवस लोणावळ्याजवळचं कार्ला गाव. एकवीरा आईचा डोंगर व त्यापाठी कोरलेली हिनयान पंथाची सर्वोत्कृष्ट लेणी. लेण्यासमोर सोळा कोनांचा स्तंभ उभा आहे. लेण्यातली हत्तीची शिल्पं नजर लागण्याइतकी जिवंत आहेत. लेण्यामधील चैत्यावर दोन हजार वर्षांपूर्वीची लाकडी छात्रावली आहे. एकवीराला बेसकॅम्प असणार आहे. रिपोर्टिंगनंतर नवीन वातावरण रुळण्यासाठी ट्रेकर्स कार्ला लेणी, एकवीरा मंदिर व कार्ला टॉप, जेथून शिरोटा लेकचं सुंदर दर्शन होतं, तिथवर एक छोटा ट्रेक करतील.
दुसरा दिवस कार्ल्यापासून पाच किमी अंतरावर भाजे लेणी आहेत. इस पूर्व 250 मधली ही लेणी महाराष्ट्रातली आद्य लेणी आहेत. ऐरावतावरील इंद्र व चार घोड्यांच्या रथावरील सूर्य यांच्या प्रतिमा लेण्यात कोरल्या आहेत. भाजे लेणी पाहून आपण जाणार आहोत ते विसापूर किल्ल्यावर. प्रचंड विस्तार असणारा हा किल्ला आहे. लांबलचक तटबंदी व तटावर जागोजागी कोरलेले संरक्षक मारुती हे या गडाचं वैशिष्ट्य. गडावर जमिनीवर बांधलेला गोलाकार बुरुज आहे. विसापूर उतरून आपण लोहगडवाडीत येणार. तेथून पायऱ्यांच्या वाटेने गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा व शेवटी महादरवाजा असं करत आपण गडावर येऊन पोहोचू. लोहगडाचं मुख्य आकर्षण आहे ते विंचूकाटा. दुहेरी तटबंदी असणारी ही माची. दोन्ही बाजूस गर्द झाडी असणारी. गडावरील लोमेश ऋषीच्या गुहेत आपण मुक्काम करणार आहोत.
तिसरा दिवस आज आपण लोहगड उतरायचा. पवना धरण पाहून लोणावळ्यात यायचं. तेथून पुढे खंडाळ्याची वाघदरी पाहायची आणि कुणे गावात यायचं. कुणे गाव दरीच्या तोंडावर वसलं आहे. तेथून खंडाळा घाट आपल्याला सतत खुणावत राहतो. आजचा मुक्काम कुणे गावात खंडाळ्याच्या कुशीत.
चौथा दिवस कुणे गावातून पाच तासांचा ट्रेक करून आपण पोहोचतो राजमाचीला. राजमाचीला दोन बालेकिल्ले आहेत. पूर्वेकडला श्रीवर्धन, तर पश्‍चिमेकडला मनरंजन. ते आपण उद्या पाहणार आहोत. आज आराम करायचा. संध्याकाळी राजमाचीच्या तळ्यावरील मंदिराकडून सूर्यास्त पाहायचा. हे मंदिर अलीकडेच गावकऱ्यांनी उत्खनन करून शोधून काढलं आहे. आजचा मुक्काम राजमाचीकरांच्या घरात.
पाचवा दिवस श्रीवर्धन व मनरंजन आणि त्यामधोमध आहे बहिरोबाचं मंदिर. उठेवाडीतून सोप्या वाटेने मनरंजनवर चढायचं. इथे पाण्याची टाकी, जोत्यांचे अवशेष दिसतात. इथून कर्नाळा, प्रबळगड, इर्शाल, ठाक हे किल्ले दिसतात. मनरंजन पाहून बहिरोबाच्या मंदिराकडून श्रीवर्धन चढायचा. याची उंची मनरंजनपेक्षा जास्त आहे. शाबूत असणारी तटबंदी. टोकांकडले दुहेरी तट असणारे चिलखती बुरुज व पाण्याची असंख्य टाकी. राजमाची पाहून झाला की संध्याकाळी पुन्हा तलावाकडे यायचं ते ट्रेझर हंटसाठी. आजचा मुक्काम राजमाचीवरच.
सहावा दिवस आज सकाळीच राजमाची उतरायला लागायचं ते उल्हास व्हॅलीच्या बाजूला. खाली दिसणारी उल्हास, नदीसमोर दुसऱ्या अंगाला खंडाळा घाटातलं ठाकूरवाडी स्टेशन. तीन तासांत आपण पोहचतो ते कोंडाणा लेण्यांकडे. आठ चैत्यविहार असणारी कोंडाणे लेणी इतकी सुबक आहेत की लाकडात कोरीव काम केल्याप्रमाणे भासतात. पिंपळपानाच्या आकाराची लेण्याची कमान खूपच सुंदर आहे. लेण्यांकडून तासाभरात कोंदीवडे गावात पोहचायचं. तिथे आपला पदभ्रमणाचा कार्यक्रम संपतो. तिथून रिक्षाने कर्जत स्टेशन गाठायचं
मधुकर धुरी, YHAI मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

No comments: