शिवथर घळ

रामदासस्वामींच्या अनेक घळींपैकी ही सर्वांत महत्त्वाची, भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोक्‍याच्या जागी वसलेल्या या घळीची महती काय वर्णावी? रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवरील घळ, रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा (प्रचंडगड) अशा दुर्गश्रेष्ठांच्या सान्निध्यात समान अंतर राखून असलेली. शिवकालीन महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणे येथून श्री समर्थांना अतिशय सोपे होते. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या महाड या मुख्य ठिकाणापासून जेमतेम 25 किलोमीटर अंतरावर, डोंगराच्या बेचक्‍यात वसलेली ही घळ. घळीच्या डोक्‍यावरूनच शिवथर नदीचा प्रवाह अनामिक आतुरतेने कड्यावरून खाली झेप घेतोय, आजूबाजूला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील जावळीच्या प्रसिद्ध खोऱ्यातील निबीड अरण्य... दिवसा भरदुपारी ज्या भागात सूर्याचे हात पोचत नाहीत त्याबद्दल रात्रीची केवळ कल्पनाच बरी! घळीपासून वरती डोंगरावर एखादा तास पायपीट केल्यावर डोळ्यांसमोर एक सुंदर पठार येते. यावरच जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे पडीक अवशेषही आहेत. थोडे उजवीकडे शेतांच्या पलीकडे असलेल्या डोंगरावर नजर जाताच शिवथर नदीचा सुरवातीचा प्रवाह धबधब्याच्या रूपात नजरेला सुखावून जातो. घळ खऱ्या स्वरूपात अनुभवण्याचा उत्तम कालावधी पावसाळ्याचा. जुलै ते सप्टेंबर हा. कारण यादरम्यान निसर्ग ऐन भरात असतो. चहूकडे हिरवळ, जलप्रपाताची आसमंतात गर्जून, उरात धडकी भरवणारी गर्जना, अधूनमधून चालू असणारी पावसाची रिपरिप, डोंगरांच्या बेचक्‍यात अडकून पडलेला नाठाळ वारा... माणूस "स्वत्व' हरवून जातो. शिवथर घळीला जाण्यासाठी महाड सर्वांत सोईचे ठिकाण आहे. एसटी महामंडळातर्फे घळीकरता दिवसातून तीन-चार वेळा गाड्या सोडल्या जातात. महाड आगाराची सर्वांत शेवटची एसटी घळीला मुक्कामालाच जाते. सकाळी सात वाजता ती परत महाडला येते. स्वतःचे वाहन असणाऱ्यांसाठी महाडजवळच्या बिरवाडी फाट्यावरून आत वळल्यावर स्थानिक लोकांना विचारल्यास लोक त्वरित मदत करतात. जवळच तीन-चार किलोमीटरवर कुंभे शिवथर नावाचे गाव आहे. घळीची सर्व व्यवस्था "श्री सुंदरमठ सेवा समिती' बघते. समितीच्या वतीने राहण्याची व जेवणाची व्यवस्था विनामूल्य केली जाते. निवासाकरिता कमीत कमी सात दिवस अगोदर पत्रव्यवहार करावा. अन्यथा भाविकांना गैरसोईला तोंड द्यावे लागते. त्यासाठी पत्ता असा- श्री सुंदरमठ सेवा समिती, मु. शिवथर घळ, पो. कुंभेशिवथर, ता. महाड, जि. रायगड. वातावरणाचे आणि स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी पर्यटकांना समितीतर्फे आवाहन करण्यात येते, की केवळ पर्यटनाच्या दृष्टीने न बघता परिस्थितीनुरूप वागावे. स्थळाची शांतता व पावित्र्य अबाधित राखावे. दर वर्षी दासनवमीला येथे मोठा उत्सव करण्यात येतो. मुख्य घळीत, रामदासस्वामी, शिष्य कल्याण व राम-लक्ष्मण-सीता यांच्या मनोहारी मूर्ती आहेत. रामदासस्वामींनी "दासबोध' येथेच पूर्ण केला. अशी ही शिवथर घळ प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. कसे जाल? जवळचे बस स्थानक महाड- 25 किलोमीटर. महाड-पोलादपूर रस्त्यावर बिरवाडी फाट्यावर डावीकडे वळून आतमध्ये. कालावधी ः पावसाळा (जून ते सप्टेंबर) (उन्हाळा-हिवाळ्यात निसर्गसौंदर्याचा अनुभव कमी.) निवासाकरता अगोदर पत्रव्यवहार आवश्‍यक। - डॉ. मोहित विजय रोजेकर

3 comments:

Prasad Pachpande said...

atishay chhan varnan kele aahe tumhi

Mangesh said...

अतिशय सुरेख वर्णन केले आहे !!

MAHESH said...

समर्थाचे २८ वर्षे वास्तव्य असलेली शिवकालीन शिवथर प्रांतातील जागा हि सांप्रदायात समर्थांच्या मागे अपरिचित होती. त्या जागेच ऐतिहासिक पुराव्यासोबत संशोधनाचे कार्य श्री अरविंदनाथजी महाराज - आळंदी (देव) यांनी केलें आहे. त्याची माहीती व ऐतिहासिक पुरावे ह्या लिंक वर देत आहे
http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=4635985100503934906&OId=5580116005441001346&TName=