महाराष्ट्रातील आद्य लेणी

महाराष्ट्रातील आद्य लेणी

लोणावळ्याच्या पुढच्या स्टेशनावर, मळवलीला उतरलात, तर एक वेगळाच ट्रेक अनुभवायला मिळतो... हा आहे लोहगड-विसापूर-कार्ले-भाजे ट्रेक... मळवलीच्या एका अंगाला आहेत कार्ल्याची लेणी, तर दुसऱ्या अंगाला भाज्याची लेणी आणि लोहगड-विसापूरची जोडगोळी...

मुंबईहून पुण्याला आपण अनेक वेळा जातो. लोणावळा हे तर पावसाळ्यातलं आपलं आवडतं ठिकाण असतं. पण लोणावळ्याच्या पुढच्या स्टेशनावर, मळवलीला उतरलात, तर एक वेगळाच ट्रेक अनुभवायला मिळतो... हा आहे लोहगड-विसापूर-कार्ले-भाजे ट्रेक... मळवलीच्या एका अंगाला आहेत कार्ल्याची लेणी, तर दुसऱ्या अंगाला भाज्याची लेणी आणि लोहगड-विसापूरची जोडगोळी. हिनयान पंथाची सर्वोत्कृष्ट लेणी म्हणून कार्ल्याच्या लेण्यांचा उल्लेख करावा लागेल. या लेण्यांमध्ये मुळात चैत्यगृहाच्या समोर दोन सोळा कोनांचे स्तंभ होते. त्यापैकी एक स्तंभ संपूर्ण तुटला आहे, नाहीसा झाला आहे. हे दोन्ही स्तंभ सारखे होते. जो एक स्तंभ आता तिथे शिल्लक आहे, त्या स्तंभाच्या वर चार सिंहांचं शिल्प आहे. लेण्यांमध्ये जिवंत वाटतील अशी हत्तींची पूर्णाकृती शिल्पं आहेत. अनेक दानशूर, युगुलांची शिल्पं लेण्यात कोरली आहेत. चैत्यावर दोन हजार वर्षांपूर्वीची लाकडाची छत्रावली आहे. लेण्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रसिद्ध एकवीरा देवीचं मंदिर आहे. नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी आगरी-कोळ्यांची व भक्तांची तिथे सतत रीघ लागलेली असते. कार्ले लेण्याच्या समोर विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी भाज्याची लेणी आहेत. ही लेणीसुद्धा हिनयान पंथी आहेत. महाराष्ट्रातली आद्य लेणी म्हणून भाज्याच्या लेण्यांचा गौरव होतो. इसवीसनापूर्वी 240मध्ये ही लेणी खोदली असावीत. चैत्यगृहाचे कलते खांब व लाकडी फासळ्या येथे पहावयास मिळतात. ऐरावतावरील इंद्र व चार घोड्यांच्या रथावरील सूर्य यांच्या प्रतिमा लेण्यात कोरल्या आहेत. लेण्याजवळ व लेण्याला जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात अनेक धबधबे असतात. पुणेरी पर्यटक या धबधब्यांवर गर्दी करतात. भाजे गावातून गाय खिंडीपर्यंत चढावाची बैलगाडीची वाट आहे. गायखिंडीतून उजवीकडे लोहगड, तर डावीकडे विसापूर किल्ल्यावर जाता येतं. डावीकडच्या वाटेने पंधरा मिनिटं चाललं की सरळ जाणारी मोठी वाट सोडून द्यायची. सरळ वाट बोडसे लेण्याकडे जाते. वरती डावीकडे विसापूरची तटबंदी दिसत असते. वाहणाऱ्या पाण्यातून पुढे सरकणारी घसरड्या दगडांची ही वाट वर चढते. चढायला साधारण अर्धा तास पुरे... विसापूरच्या माथ्यावर प्रचंड, विस्तीर्ण पठार आहे. लांबच लांब सरळ गेलेली तटबंदी, जागोजागी तटावर कोरलेले संरक्षक मारुती हे या गडाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. गडावर एक गोलाकार बुरुज आहे. त्यावर पूर्वी तोफ असावी. वर उल्लेख केलेल्या वाटेव्यतिरिक्त मळवलीकडून दोन वाटा गडावर चढून येतात. आल्या वाटेने विसापूर उतरून लोहगड वाडीत यायचं. लोहगडपर्यंत अलीकडे डांबरी सडक आली आहे. लोहगडवाडीतून पायऱ्यांच्या वाटेने लोहगड चढू लागलो की गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि शेवटी महादरवाजा असे आखीव-रेखीव दरवाजे आपल्याला लागतात. गडाचं मुख्य आकर्षण त्याचा विंचुकाटा आहे. दुहेरी तटबंदी असलेली ही माची उतरत जाते. माचीच्या टोकाकडल्या बुरुजाकडून विहंगम दृश्‍य दिसतं. माचीच्या तटावरून चालताना खालची दाट झाडी आपली साथ करते. सुरतेच्या पहिल्या लुटेच्या वेळी आणलेला खजिना लोहगडावरील लक्ष्मी कोठीत आला होता. इथल्या लोमेश ऋषींच्या गुहेत मुक्काम करण्याची मजा काही औरच आहे. कोकणावर विजय मिळवू इच्छिणाऱ्या मुघलांच्या सैन्याला, कारतलबखानाला लोहगडापाशी उंबरखिंडीत गाठून महाराजांनी खानाचा सपशेल पराभव केला होता. मळवलीहून लोहगडाच्या बाजूने मोठ्या मिजाशीने खानाचं सैन्य गेलं होतं कोकण जिंकायला. चारीमुंड्या चीत होऊन नामुष्कीचा पराभव कारतलबखानाच्या नशिबी आला. या पराक्रमाची गाथा कल्पनेत अनुभवण्यासाठी हा ट्रेक करायला हवा.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल, मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

No comments: